
खरीप 2026 पिकस्पर्धा जाहीर; शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाचे आवाहन

राज्यातील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या उत्पादनवाढीसाठी खरीप हंगाम 2026 साठी पिकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
यंदापासून पिकस्पर्धेची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. या उपक्रमातून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि राज्याच्या एकूण उत्पादनात भर घालणे हा उद्देश आहे.
या स्पर्धेत खरीप हंगामातील भात आणि नाचणी (रागी) या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर घेण्यात येणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व त्या जमिनीवर किमान क्षेत्रात सलग लागवड केलेली असणे आवश्यक आहे. अर्जासाठी फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, बँक खात्याची माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
भात आणि नाचणी पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
या स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना तालुका स्तरावर 5 हजार, जिल्हा स्तरावर 10 हजार आणि राज्य स्तरावर 50 हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पिकस्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ येथे “पीक स्पर्धा नोंदणी” टॅबवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.







