
जेष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड; कला विश्वात हळहळ
जुलै 1, 2026 2 Min Read

जेष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शिका आणि मराठी नाट्यसृष्टीतील अजरामर व्यक्तिमत्व विजया मेहता यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक महान दीपस्तंभ गमावला असून कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
“विजया बाई” हे नाव नाट्य आणि चित्रपट सृष्टीत अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांची कारकीर्द प्रदीर्घ, समृद्ध आणि तितकीच तेजस्वी राहिली. ‘रंगायन’ ही प्रायोगिक नाट्यचळवळ उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक गाजलेली नाटके रंगभूमीवर आली. हमीदाबाईची कोठी, वाडा चिरेबंदी, जास्वंदी, पुरुष, बॅरिस्टर, अजब न्याय वर्तुळाचा, शितू, मादी, मी जिंकलो मी हरलो, एक शून्य बाजीराव, महासागर आणि हयवदन ही नाटके आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
चित्रपट क्षेत्रातही त्यांनी मोजके पण दर्जेदार काम केले. लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनावर आधारित ‘स्मृतिचित्रे’ या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
विक्रम गोखले, अशोक सराफ, रीमा लागू, नाना पाटेकर, अमोल पालेकर, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर, सुहास जोशी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी घडवले. त्या स्वतः इब्राहिम अल्काझी आणि अदी मर्झबान यांच्या शिष्या होत्या.
दिग्दर्शन आणि अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. तब्बल 14 वर्षे त्या सेन्सॉर बोर्डावर कार्यरत होत्या. 1988 साली त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्षपद भूषवले. तसेच 1993 ते 2010 या 17 वर्षांच्या कालावधीत एनसीपीए (राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र)च्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, विष्णुदास भावे सुवर्णपदक, मास्टर दीनानाथ पुरस्कार, कालिदास सन्मान आणि टागोर रत्न फेलोशिप असे अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले.इचलकरंजी येथे झालेल्या 67 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. विजया मेहता या मराठी रंगभूमीसाठी कायम दीपस्तंभासारख्या उभ्या राहिल्या. आज त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी पोरकी झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.







