
गोवंशीय तस्करीविरोधात रत्नागिरी पोलिसांची मोठी मोहीम; चार भरारी पथके सक्रिय
रत्नागिरी : गोवंशीय हत्या, अवैध वाहतूक व मांस विक्रीसारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चार भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. २३ मे २०२६ पासून कार्यान्वित झालेल्या या पथकांमार्फत जिल्ह्यात गस्त, छापेमारी व तपासणी सुरू असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. आवश्यकतेनुसार मकोका अंतर्गतही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या विशेष मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गावपातळीवर माहिती संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर-लांजा या चारही पोलीस उपविभागांमध्ये स्वतंत्र भरारी पथके कार्यरत असून, संशयित हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे.







