
चिपळूणमध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश

चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, तहसीलदार प्रविण लोकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
गेल्या चार दिवसांत प्रचंड पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पूर्ण सतर्क राहावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, तसेच संपूर्ण शासकीय यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले
कशेडी घाटातील दरड कोसळण्याबाबत स्पष्टीकरण देताना, बोगद्याच्या आत कोणतीही दरड कोसळलेली नसून डोंगरावरील भाग घसरून रस्त्यावर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भागाचा भूवैज्ञानिक अभ्यास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.वाशिष्ठी, जगबुडी आणि शास्त्री नद्यांतील गाळ काढण्याच्या कामाचा पूरनियंत्रणावर झालेला परिणाम स्थानिकांकडून जाणून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी, तसेच आरोग्य यंत्रणेला सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही पालकमंत्र्यांनी नमूद केले.







