
‘अहिल्यादेवी होळकर’ कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील असुर्डे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या 35 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना लाभार्थी शेतकरी शैलेश खापरे यांनी सांगितले की, शेतीसाठी दरवर्षी घेतले जाणारे खाऊटी कर्ज बी-बियाणे, खते आणि पेरणीसाठी वापरले जाते. मात्र, या कर्जाची परतफेड करणे अनेकदा कठीण ठरते. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेली ही कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असून हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकरी दिलीप केशव अहिरे (आंबतखोत) यांनीही आपल्या कर्जमाफीबद्दल आनंद व्यक्त करत शासनाचे आभार मानले. तर असुर्डे येथील जगदीश साळवी यांनी सांगितले की, सोसायटीकडून घेतलेले 21 हजारांचे कर्ज या योजनेत माफ होणार आहे. संतोष साळवी यांनीही त्यांच्या नावावर असलेले 25 हजारांचे कर्ज माफ होणार असल्याने शासनाचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे मत व्यक्त केले. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळून शेती व्यवसायाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







