
महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल..

मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना, प्रारूप मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रस्तावित कायद्यात विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि दत्तक प्रक्रिया यांसाठी सर्व नागरिकांना समान नियम लागू करण्याचा विचार करण्यात येत आहे. तसेच महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने बहुपत्नीत्व आणि एकतर्फी तलाक यांसारख्या प्रथांवर निर्बंध आणण्याची तरतूदही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.







