
समृद्धी महामार्गावर 7 दिवसांचा ब्लॉक; प्रत्येक वाहनावर राहणार डिजिटल नजर

नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) अंतर्गत सिन्नर ते इगतपुरीदरम्यान CCTV गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे.
अलीकडे सिन्नर परिसरात वाहनांचे टायर पंक्चर करून प्रवाशांना लुटल्याच्या घटनांनंतर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर CCTV आणि तंत्रज्ञानाधारित निगराणी व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या कामासाठी दोन टप्प्यांत ब्लॉक घेतला जाणार आहे. 31 ऑगस्ट, 1 आणि 2 सप्टेंबर रोजी सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंजदरम्यान, तर 4, 5 आणि 7 सप्टेंबर रोजी भरवीर ते इगतपुरी या टप्प्यात काम होईल. या कालावधीत मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 1 आणि नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत तासभर पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. 6 सप्टेंबरला कोणताही ब्लॉक नसणार आहे.
गॅन्ट्री बसवण्यासाठी मोठ्या क्रेन आणि यंत्रसामग्रीचा वापर होणार असल्याने वाहतूक थांबवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी ब्लॉकच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ITMS प्रणालीमुळे महामार्गावरील वाहनांची हालचाल, अपघात, वाहतूक कोंडी आणि संशयास्पद हालचालींवर तात्काळ लक्ष ठेवता येणार आहे. संवेदनशील ठिकाणी CCTV नेटवर्क मजबूत झाल्यास गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवणे आणि आरोपींचा माग काढणे अधिक सुलभ होणार आहे.






