
शौर्य पदक विजेत्या जवानांना त्यांच्या एका सहकाऱ्यासह ‘मानद आजीवन मोफत रेल्वे प्रवास पास’

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर प्राणांची बाजी लावून शौर्य गाजवणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या संयुक्त समन्वयातून आता सेना पदक, नौसेना पदक आणि वायुसेना पदक (शौर्य पुरस्कार) विजेत्या जवानांना त्यांच्या एका सहकाऱ्यासह ‘मानद आजीवन मोफत रेल्वे प्रवास पास’ (Complimentary Life Long Free Rly Travel Passes) दिला जाणार आहे.
परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र यांसारख्या सर्वोच्च ‘चक्र मालिका’ पुरस्कार विजेत्यांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ही मोफत पास सुविधा आधीपासूनच लागू आहे. आता या सुविधेची व्याप्ती वाढवून इतर शौर्य पदक विजेत्या जवानांचाही यात समावेश करण्यात आल्यामुळे सैनिक वर्गातून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून या निर्णयाचे अत्यंत मोठे आणि मनापासून स्वागत होत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शौर्य पदक विजेत्यांनी किंवा त्यांच्या आश्रितांनी आपले पासेस मिळवण्यासाठी खालील कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे:
पीपीओ (PPO) प्रत
ओळख व निवासाचा पुरावा (अधिकृत ओळखपत्र)
गॅझेट नोटिफिकेशन (राजपत्र अधिसूचना) प्रत
येथे साधा संपर्क: जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पात्र शौर्य पदक विजेत्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उत्तर रेल्वेच्या जीएम (पास) कार्यालय किंवा त्यांच्या संबंधित विभागाच्या डीआरएम (DRM) कार्यालयाशी संपर्क साधून आपले पासेस मिळवून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.







