
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारताच राज्यभरात “मुंढे पॅटर्न”ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यांच्या कडक आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे प्रशासनात मोठी हालचाल दिसून येत असून, गैरप्रकार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचेच पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटले असून, अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत जिल्हाभरात आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, ६ लाख १४ हजार ५५७ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा गुन्हे दाखल करत आठ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
गुटखा विक्रीसोबतच हॉटेल्सवरही प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यातील सुमारे ६० हॉटेल्सची अचानक तपासणी करण्यात आली. यामध्ये स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेल्सना सुधारणा नोटीस बजावण्यात आली असून, तीन प्रकरणांमध्ये २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक नोंदणी असूनही मनुष्यबळाची तीव्र कमतरता असल्याचे चित्र आहे. सहाय्यक आयुक्त पद रिक्त असून सध्या अतिरिक्त कार्यभारावर कारभार सुरू आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर इतक्या मोठ्या जिल्ह्यात सातत्यपूर्ण कारवाई करणे आव्हानात्मक ठरत आहे. दरम्यान, या धडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात तपासणी आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत असून, रत्नागिरीतील बेकायदेशीर व्यवसायांवर प्रशासनाचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे.





