
रत्नागिरीत उपविभागीय अधिकारीपदी हरियाणाच्या IPS आरांशा यादव यांची नियुक्ती

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी (SDPO) निलेश माईणकर यांची पालघर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या IPS अधिकारी आरांशा यादव यांची रत्नागिरी उपविभागीय अधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आरांशा यादव या हरियाणातील असून त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २०२२ मध्ये ३०२वा क्रमांक मिळवत भारतीय पोलीस सेवेत (IPS) स्थान मिळवले. त्या २०२३ बॅचच्या अधिकारी असून सध्या महाराष्ट्र कॅडरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून इंग्रजी विषयात पदवी (B.A. Honors) पूर्ण केली असून त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) आंतरराष्ट्रीय संबंध विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
सुरुवातीला त्यांची निवड गुजरात कॅडरसाठी झाली होती. मात्र, २०२३ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IPS अधिकारी अनमोल मित्तल यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचा कॅडर बदलून महाराष्ट्रात करण्यात आला. कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून त्यांनी काम पाहिले असून आता त्यांच्यावर रत्नागिरी उपविभागीय अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सध्या थोरात यांच्याकडे प्रभारी स्वरूपात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही महत्त्वाच्या पदांवर सध्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून कामकाज सुरू आहे. या बदलांमुळे प्रशासकीय यंत्रणेत नवे नेतृत्व मिळणार असून कामकाजात गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







