
रत्नागिरीत ‘खेलो इंडिया’ बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रासाठी १३ ऑगस्टला खेळाडू निवड चाचणी

रत्नागिरी जिल्ह्यातील १० ते १४ वयोगटातील प्रतिभावान खेळाडूंसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘खेलो इंडिया’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळाल्यानंतर या केंद्रासाठी येत्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, मारुती मंदिर (रत्नागिरी) येथे पार पडणार आहे. या चाचणीतून एकूण ३० खेळाडूंची निवड केली जाणार असून त्यामध्ये १५ मुले आणि १५ मुलींचा समावेश असेल.
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका खेळासाठी ‘खेलो इंडिया’ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी बॅडमिंटन खेळाची निवड करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रगतीची संधी मिळणार आहे.
दरम्यान, जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.







