

हा लोकशाहीचा व विद्यार्थ्यांच्याआंदोलनाचा विजय – अभिजीत दिपके
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी “आपण करून दाखवलं!” असे म्हणत हा विद्यार्थ्यांच्या ३६ दिवसांच्या आंदोलनाचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे घोषित केले.
जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा राजीनामा मिळाल्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला. टाळ्या, घोषणाबाजी आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी आपल्या लढ्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली.
अभिजीत दिपके म्हणाले, “या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, असं सांगितलं जात होतं. पण आम्ही हार मानली नाही आणि अखेर आपण करून दाखवलं.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, सरकारसमोर न झुकता ठामपणे आंदोलन केल्यास मोठमोठ्या पदांवरील व्यक्तींनाही राजीनामा द्यावा लागतो.
दरम्यान, नीट (NEET) प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच आंदोलनादरम्यान लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिपके यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे.
या घडामोडींमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारला झुकवण्याची ताकद दाखवून दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.






