
धर्मशास्त्रावरील आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्रामार्फत राबविण्यात आलेला “इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इन धर्मशास्त्र” हा संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली यांच्या अष्टादशी संशोधन योजनेअंतर्गत या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य मिळाले होते.प्रा. मधुसूदन पेन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या प्रकल्पात धर्मशास्त्र आणि आधुनिक भारतीय न्यायव्यवस्था यांतील संबंधांचा अभ्यास करण्यात आला. मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, नारदस्मृती, कौटिलीय अर्थशास्त्र आदी प्राचीन ग्रंथांच्या आधारे वारसाहक्क, पुरावा, कर्जवसुली, सीमाविवाद, करारभंग, मानहानी आणि स्त्रियांविरुद्धचे अपराध यांसारख्या विषयांची आधुनिक भारतीय कायद्यांशी तुलना करण्यात आली.या संशोधनातून आधुनिक भारतीय न्यायव्यवस्थेतील अनेक मूलभूत तत्त्वांची मुळे भारतीय धर्मशास्त्रीय परंपरेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचा दुसरा टप्पादेखील मंजूर झाला असून रत्नागिरी उपकेंद्रात पुढील संशोधनकार्य सुरू झाले आहे.






