
विविध प्रवर्गातील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतींच्या परताव्यासह कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मागण्यात आलेल्या तब्बल 3 हजार 771कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला राज्य सरकारच्या वित्त विभागाने आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पुन्हा एकदा गंभीर आर्थिक संकटात सापडले आहे. विविध प्रवर्गातील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतींच्या परताव्यासह कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मागण्यात आलेल्या तब्बल 3 हजार 771कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीला राज्य सरकारच्या वित्त विभागाने आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे विविध सामाजिक योजनांअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवास सवलतींच्या थकीत परताव्यासह कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीवेतन आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी विशेष आर्थिक मदतीची मागणी केली होती. मात्र, राज्याच्या मर्यादित आर्थिक स्रोतांवर वाढता ताण, महसुली तूट आणि वित्तीय तूट वाढत असल्याचे कारण देत वित्त विभागाने अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास नकारात्मक भूमिका घेतली आहे.







