
धामणसे हटवाडी पुलामुळे विकासाला नवी दिशा; सोमगंगा नदीवरील पूल बनले पर्यटकांचे आकर्षण केंद्र

रत्नागिरी : धामणसे ग्रामपंचायत हद्दीतील सोमगंगा नदीवरील बहुप्रतिक्षित हटवाडी पुलाचे काम पूर्ण झाले असून, या विकासकामामुळे धामणसे परिसराच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. निसर्गरम्य वातावरण, सोमगंगा नदीचे सौंदर्य आणि पुलामुळे उपलब्ध झालेली सुविधा यामुळे हा परिसर आता पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे. दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत असून सोशल मीडियावरही या ठिकाणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर धामणसे हटवाडी पुलाची जोरदार चर्चा
धामणसे हटवाडी पूल आणि सोमगंगा नदी परिसरातील निसर्गसौंदर्याने सोशल मीडियावरही मोठी लोकप्रियता मिळवली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, लाखो नागरिकांनी या निसर्गरम्य स्थळाला पसंती दिली आहे. कोकणातील एक नवीन पर्यटनस्थळ म्हणून धामणसे हटवाडी परिसराची ओळख निर्माण होत असून, पर्यटकांचा वाढता प्रतिसाद या ठिकाणाच्या लोकप्रियतेची साक्ष देत आहे.
धामणसे हटवाडी पुलाचे भूमिपूजन त्यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते झाले होते. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार म्हणून कोकणच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
भूमिपूजनावेळी रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी पावसाळ्यात नागरिकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी हा पूल महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगितले होते. तसेच
केवळ पूल उभारणे नव्हे, तर जलसंधारणासोबत ग्रामीण विकासाचे एक आदर्श मॉडेल उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आज हे विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने जलसंधारणाला मिळाली चालना
धामणसे येथील सोमगंगा नदीतील गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि नाम फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले. नदीतील मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ काढल्यामुळे नदीची जलधारण क्षमता वाढली असून, आज या परिसरातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.
या जलसंधारणाच्या कामाचा सकारात्मक परिणाम म्हणून नदी परिसरातील आजूबाजूच्या विहिरींनाही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेती, ग्रामस्थांचे पिण्याचे पाणी आणि परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांना मोठा फायदा झाला आहे.
या कामासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. विकासकामांसोबतच जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाला महत्त्व देण्याची त्यांची भूमिका या माध्यमातून अधोरेखित झाली आहे.
आमदार किरण सामंत यांची भेट; घेतला जलपर्यटनाचा आनंद
रत्नागिरी–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किरण उर्फ भैय्या सामंत यांनी नुकतीच या ठिकाणी भेट देऊन पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सोमगंगा नदीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेतला.त्यांच्या या भेटीमुळे धामणसे येथील पर्यटनाच्या दृष्टीने असलेल्या संभाव्यतेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आमदार किरणजी सामंत यांनी सांगितले.की
पुलाजवळ आवश्यक सोयी-सुविधांसाठी आर्किटेक्टच्या माध्यमातून आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.







