

MSEB कडून नवे आश्वासन, मिऱ्यावासियांच्या आंदोलनाला यश
सोम.दि.१३ जुलै रोजी मिऱ्यावासियांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. मिऱ्यावासियांच्या मागणीनुसार MSEB चे अधिकारी जाधव यांनी ग्रा.पं.जाकिमिऱ्या येथे भेट घेतली. परिसरातील नादुरुस्त वीजवाहिन्या आणि रेडबॉक्सची पाहणी करून येत्या महिनाभरात दुरुस्तीचे आश्वासन मिऱ्यावासियांना देण्यात आले आहे. महिन्याभरात दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यास मिऱ्यावासीय पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.
रत्नागिरी जिल्ह्यात भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाची सुरुवात तालुक्यातील मिऱ्या गावापासून करण्यात आली. मात्र आता याच भूमिगत वीजवाहिन्या मिऱ्यावासियांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. या वीजवाहिन्यांचा मेंटेनन्स नक्की कुणी करायचा? याचा शोध ना महावितरणला लागला आहे ना जिल्हा प्रशासनाला.
या वीजवाहिनीला गावातील स्ट्रीटलाइट जोडण्यात आल्या आहेत. मात्र या स्ट्रीटलाईट दिवसरात्र सुरू राहतात. दिवस त्या बंद कशा करायचा हा प्रश्नच आहे. गेली चार वर्ष या लाईट सतत सुरू राहिल्याने आता त्या काही ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या अपघटनांना जबाबदार कोण? असा प्रश्न मिऱ्यावासियांकडून विचारला जात आहे.
याहीपेक्षा भूमिगत वीज वाहिनीचे रेड बॉक्स जागोजागी उघडे पडले आहेत तर अनेक ठिकाणी या वाहिन्या जमिनीच्यावर आल्या आहेत. या उघड्या रेडबॉक्सला चिकटून मागील वर्षी दोन गुरे दगावली होती. मात्र याबाबत महावितरणने मात्र हात वर केले आहेत.
मिऱ्या ग्रामस्थांनी वारंवार पालकमंत्र्यांकडे, प्रशासनकडे आपले गाऱ्हाणे मांडले. पण गेली दोन वर्ष या वीजवाहिन्या म्हणजे गावात उभे असलेले मृत्यूचे सापळे बनले आहेत. या रेडबॉक्सला चिकटून दोन गुरे तर दगावली. आता प्रशासन गावकऱ्यांचा जीव जाण्याची वाट बघत आहेत का? असा सवाल मिऱ्यावासियांनी केला आहे.
आता या भूमिगत वीजवाहिन्या गावातल्या जलजीवनच्या कामासाठीही अडथळा ठरत आहेत. या भूमिगत वीजवाहिन्यांमुळे जलजीवनच्या पाईपलाईन टाकण्यास अडथळा येत असल्याचे पत्र आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे. यासंदर्भात मिऱ्यावासियांनी सोमवारी MSEBच्या बाहेर आंदोलन केले. या आंदोलनाला आता मोठे यश आल्याचे दिसून येत आहे. आज MSEBसोबत झालेल्या बैठकीत काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले.







