
खेडमधील नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या; पंचनाम्यांचे आदेश – उदय सामंत

रत्नागिरी – जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. खेड शहरातील नुकसानग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. “या संकटसमयी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास देत त्यांनी त्यांना धीर दिला.
या पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत, पालकमंत्री डाॕ सामंत यांनी प्रशासकीय यंत्रणेला तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत आणि बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह आवश्यक ती सर्व मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान नगराध्यक्ष माधवी, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, जि प सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, कुंदन सातपुते आदी उपस्थित होते.
पावसाचे पाणी ओसरल्यानंतर शहरात झालेले नुकसान आणि व्यापाऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान यावर पालकमंत्र्यांनी स्थानिक व्यापारी संघटना आणि नागरिकांशी सविस्तर चर्चा केली. प्रशासनाने मदतकार्यात कुठेही दिरंगाई करू नये, अशा स्पष्ट सूचना यावेळी डाॕ सामंत यांनी दिल्या.







