

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी…. रत्नागिरी विमानतळावरून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानसेवेसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, केंद्राच्या संरक्षण विभागाशी अधिकृत करार झाल्यानंतर विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी सांगितले की, संबंधित एअरलाईन्स कंपनीने निविदा प्रक्रियेची पूर्तता केली आहे. आता संरक्षण विभागासोबतचा करार पूर्ण होताच प्रवासी विमानसेवेला हिरवा कंदील मिळणार आहे.
यावेळी त्यांनी विमानतळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तांत्रिक आणि पायाभूत सुविधांबाबत आवश्यक सूचना दिल्या. विमानतळाचे उर्वरित काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रत्नागिरी विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विमान वाहतूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा विचार प्रशासन करत आहे.
रत्नागिरीत विमानसेवा सुरू झाल्यानंतर पर्यटन, उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हावासी विमानसेवेच्या पहिल्या उड्डाणाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.







